Saturday 31 August 2019

अबब .... १. ७६ लाख करोड !

 दोन दिवसापूर्वी   मुलीच्या शाळेतले " वार्षिक स्नेहसंमेलन ( Gathering ) " पाहण्याचा योग आला।  मुला-मुलींनी बसविलेली नाटके , नृत्य  एकदम मस्त होते।  या निमित्ताने मस्त धिंगाना घालायचे परमिट मिळालेले त्यामुळे बच्चे कंपनी मजेत होती। शिक्षकांनी देखील खुप तयारी करून  घेतलेली असल्याने आपले नाटक किंवा नृत्य  चांगले करण्यासाठी प्रत्येक जण  खास काळजी घेत होते।  या मध्ये शिवाजी महाराज , गणपती  उत्सव , दुर्गा देवीची आरती अशा  पारंपरिक श्रद्धास्थानापासून ते  अगदी आजच्या काळातील दुष्काळ , स्री भ्रूण हत्या , नशाबंदी  या सामाजिक आशयावर  पण  मनाला टोचणी लावणारे भाष्य केले जात होते।  याच अंतर्गत "पोस्टर गर्ल " या चित्रपटातील    गाण्यावर  शाळेतील "सेकंडरी डिवीज़न " च्या मुलींचे नृत्य  खूपच रंगले  होते।  उत्साहात  छान नृत्य  मोबाइलच्या  कॅमेरात कैद करावे म्हणुन रेकॉर्डिंग करत असतानाच  " News Popups" अणि त्या पाठोपाठ " Whats app   messages "  चा भडिमार चालू झाला।  कारण होते   खालील  ब्रेकिंग न्यूज़ चे 

" RBI Bonanza:  INR 1.76 lakh crores to be transferred to Indian Government"
OR
" RBI Autonomy in danger:  Daylight robbery of  INR 1.76 Lakh Crores"
OR
" Lender of Last resort(RBI)  rescued Spender of last resort( Govt Of India) : Ifs and buts of INR 1.76 lakhs Crores"

मागे स्नेहसंमेलनतील नृत्य रंगात आले होते।  गाण्याचे  बोल  मला खुणावत होते अणि कुठे तरी मला त्या ब्रेकिंग न्यूज़ पर्यन्त खेचून आणत  होते। 

"तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
ये ग, ये ग रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी
सावलीच्या पावलांनी, विठूच्या गाभारी"

या वैकुंठरूपी भारत देशाचा कारभार चालविताना/देशाचे रहाटगाडघे   हाकताना     विठुरायाला ( मायबाप सरकारला )  उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ  घालत ( वित्तीय तूट )  सुखी संसार चालविणे एकट्याला अवघड होऊन बसले आहे .  संसार सुखाचा करण्यासाठी  म्हणजे देशातील लोंकांना सोयी सुविधा देण्यासाठी लागणारा निधी उभारणे गरजेचे आहे . अर्थव्यवस्था ओढग्रस्तीला लागलेली असताना  त्यात नवीन गुंतवणूक रुपी प्राण फुंकणे गरजेचे आहे , अशा वेळेला वरील गाणे म्हणजे  प्रजेने रखुमाईला (RBI) ला घातलेले साकडेच म्हणावे लागेल .  लाभांश (Dividend) रुपी  पावलांनी  रखुमाईने (RBI ने ) सरकारच्या तिजोरीत  ( विठूच्या गाभारी  ) आपले दान टाकावे  म्हणजे सरकार त्या गंगाजळीचा वापर  लोकपयोगी कामांसाठी करून  प्रजारुपी भक्तांना  रस्ते ,रोजगार , चांगले जीवनमान उपलब्ध करण्यासाठी कामाला लागेल . 

"RBI Dividend  म्हणजे काय रे भाऊ... " याचे सोपे उत्तर म्हणजे "RBI ने वर्षभरात कमविलेल्या नफ्याचा  काही वाटा  भागधारक (Shareholder) म्हणून  भारत सरकारकडे सुपूर्द करणे जेणे करून तो पैसा सरकारला  आपले काम करण्यासाठी वापरता येईल.   हा नफा RBI ने  त्यांची गुंतवणूक धोरणे  (  investment in Gold , Sovereign Bonds, Indian Govt. Bonds ) आणि त्यांचे  " रोकडसुलभता ( Liquidity Management ) , पतधोरण ( Credit Policy)  आणि देशातील  चलन ( तुम्ही -आम्ही  जे पैसे किंवा नोटा वापरतो ते ) पुरवठा (Currency Management) "अशा  देशाच्या आर्थिक  आरोग्याशी निगडित  गोष्टींचे  व्यवस्थापन यातून कमाविलेला असतो .

जसे कुठल्याही खासगी किंवा  सूचिबद्ध  आस्थापनांमध्ये ( Pvt Ltd co किंवा  Listed  entities),  झालेल्या नफ्याचा काही भाग लाभांश (Dividend) म्हणून  भागधारकांना ( Shareholders ) दिला जातो, तसाच हा प्रकार . वरकरणी पाहता यात काय विशेष , असा प्रश्न पडणे साहजिक आहे .तरी पण या वार्षिक  सोपस्कारावर एवढा गदारोळ किंवा चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्या लाभांशाची( Dividend)  भव्यता ( INR 1.23 lakh Crore) आणि  आपत्कालीन काळासाठी राखीव ठेवलेल्या पुंजीतून ( Contingency reserves) सरकारने स्वत:कडे वळते केलेले पैसे ( INR 53 lakh Crore) 

हे थोडेसे आपल्या घरोघरी पूर्वी असणाऱ्या आजीबाईच्या " जादूच्या बटव्याप्रमाणे " आहे . पूर्वी घरखर्चासाठी  पैसे दिल्यानंतर घरातील बायका त्यातील काही पैशातच  रोजच्या गरजा भागवून राहिलेला पैसा बचत करून ठेवायच्या . ते पैसे पण, घरी वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या वाट्यामध्ये ठेवलेले असायचे . त्यामागील उद्देश म्हणजे अचानक येणाऱ्या संकटाच्या वेळी लोंकांपुढे हात न पसरता आपल्याकडील पैसे वापरता यावेत.  ती जशी 
आपत्कालीन काळासाठी राखीव पुंजी (Contingency reserves) असते , तशीच देशाच्या  पातळीवर RBI स्वतःच्या झालेल्या नफ्यातून काही  पैसे असे आपत्कालीन काळासाठी राखून ठेवते . ते किती ठेवावेत  आणि सध्या जी आर्थिक आपत्कालीन परिस्थिती आहे तेव्हा  त्या पुंजीतील पैसे काढून का वापरू नयेत या दोन मुद्दांवर  गदारोळ उठलेला आहे . 

हे विचार मनात चालू असताना गाण्याचे पुढले कडवे चालू झाले 

"तुझी थोरवी महान, तिन्हीलोकी तुला मान
देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई"

RBI  म्हणून असणारी एक संस्थात्मक रचना , तिची स्वायत्तता , देशाच्या आर्थिक आरोग्याशी निगडित  गोष्टींचे व्यवस्थापन करताना  गरजेचे असणारे स्वातंत्र  याचा पण बराच उहापोह झाला . या RBI रुपी रखुमाईची थोरवी आणि  तिच्या कामाबद्दल जगात असणारा मान  या सर्व गोष्टी कुठे तरी  योग्य पद्धतीने हाताळल्या जात नाही आहेत असे  वातावरण तयार झाले .  ही मदत जर तुम्ही आम्हाला ,आम्ही म्हणतो त्या अटींवर केलीत तरच आम्ही तुमच्या स्वतंत्र , स्वायत्त अशा जगभरात नाव असणाऱ्या संस्थेची पालखी   वाहू  असे  सरकार सूचित करत आहे असे वातावरण तयार झाले . 


साहजिकच या मुद्दयावर राजकारण पण तापायला सुरवात झाली .  " दिवसाढवळ्या केलेली लूट " ते " नेहमीची शासकीय  पद्धती " अशा  दोन टोकाच्या प्रतिक्रियांच्या हिंदोळ्यावर हा अति महत्वाचा विषय अडकून पडला. 

यातील  गांभीर्य लक्षात घेण्यासाठी  "INR 1.76 Lakh Crores" याची व्यापकता लक्षात घेतली पाहिजे. ती कशी तर हा पैसा  किती आहे , तो जास्त आहे कि भव्य आहे हे तपासायचे झाले तर  एक गंमतीदार तुलना करता येईल 

या पैशांमधून  
  • दुपारी शाळेतून दिले जाणारे "Midday Meal " ही योजना पुढील १६ वर्षे चालविता येईल 
  • मनरेगा  ही जी ग्रामीण रोजगार योजना आहे ती  पुढील ३ वर्षें  चालविता येईल 
  • किसान सन्मान योजना (Farmer Income Scheme) ही पुढील २ वर्षे चालू ठेवता येईल 
  • १०८ राफेल विमाने एका झटक्यात खरेदी करता येतील 
  • १७६ चांद्रयान अवकाशात सोडता येतील 
  • ३५० बाहुबली  किंवा ५० अवतार सारखे भव्य  खर्चिक सिनेमे निर्माण करता येतील 
  • २ फुटबॉल वर्ल्ड कप  एकाच वेळी आयोजित करता येतील 

 साहजिकच  माझ्या  भावना  गाण्याच्या शेवटच्या  कडव्याप्रमाणे होत्या  

"तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर
आता करू दे जागर, होऊ दे ग उतराई "

RBI रुपी रखुमाईने  हा भव्य खजिना मायबाप सरकार साठी ( विठूरायाची) खुला करावा  आणि त्यातून प्रजेच्या हिता ची कामे चालू व्हावीत . 

कार्यक्रम संपून घरी येताना  जाणविले की खरी मेख  तर इथून पुढे आहे. 

तुकोबांनी म्हंटल्याप्रमाणे 

"जोडोनिया धन उत्तम व्यवहारे 
उदास  विचारे खर्च करे ."

एकदा सरकारकडे  पैसा जमा झाल्यानंतर  उदास विचारे म्हणजे  अलिप्ततेने म्हणजे " राजकीय , भाषिक, जातीय " समीकरणे बाजूला ठेऊन ,  लोकानुयायी निर्णय न  घेता देशाला समृद्ध राष्ट्र बनविण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवर खर्च करणे गरजेचे आहे .  आलेला  पैसे  रस्ते बांधणी , बँकिंग व्यवस्थेला भांडवल पुरवठा  अशा रोजगार निर्माण करणाऱ्या किंवा अर्थव्यवस्थेला गतिशील करणाऱ्या प्रकल्पामध्ये गुंतवला जाणे हिताचे ठरेल तोच पैसा जर वित्तीय तूट भरण्यासाठी  किंवा  अनुदान वाटपासाठी सरकारने वापरला तर राखीव पुंजीची चैनीसाठी केलेली उधळपट्टी ठरेल. 

या प्रमाणे जर विठुराया ( मायबाप सरकार ) वागला तर रखुमाई (RBI)पण  हा वैकुंटरूपी देश  आर्थिक ओढग्रस्तीतून बाहेर काढून पुन्हा एकदा  प्रगतीपथावर नेण्यासाठी  आपल्यापरीने मदत करतच राहील  

"सरकारला डोके ठिकाणावर ठेऊन निर्णय घेण्याची सुबुद्धी दे  " असे गजाननाला साकडे घालून आज इथेच थांबतो . असा विचार करून  संकल्प सोडण्यासाठी " गणेश चतुर्थी " पेक्षा दुसरा कोणता दिवस जास्त चांगला असेल .  

गणेश चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा ! "गणपती बाप्पा मोरया "!

Saturday 24 August 2019

                                                         
                                                             खाण्याविषयी थोडेसे.....

अधिक खाण्यावरून खूप बोलणे ऐकल्यानंतर  आता मलाही मनापासून  खाण्याविषयी आपण पण काहीतरी बोलावे  असे वाटू लागले आहे।  आपल्याकडे म्हणतात ना "  एक वेळ नकटे  व्हावे  पण धाकटे  नको ", त्याच धर्तीवर " मठ्ठ असले तरी चालेल पण लठ्ठ नको " अशी काहीतरी लोकांची समजूत झालेली आहे।  माणूस लठ्ठ असणे याच्याशी त्याच्या "अधिक " खाण्याचा संबंध आहे असा एक सार्वजनिक गैरसमज आहे।  भरपूर , चापून खाणारी  कृश राहिलेली " पाप्याची पितरे " मी आजूबाजूला खूप पाहली आहेत। पापी माणसे बारीक़ असतात यावर भरपूर वर्ष हिंदी चित्रपट पहिल्यामुळे माझा तरी विश्वास बसत नाही। खलनायक लोक  पडद्यावर चांगल्या तंगड्या हाणताना  पाहून त्यांची पितरे कृश असतील यावर मी झोपेत पण विश्वास ठेवू शकत नाही। अविश्वास दाखवून स्वस्थ बसणे माझ्या चळवळया  स्वभावात बसत नसल्याने या विरुद्ध लठ्ठ लोकांची एक ऑनलाइन चळवळ उभी करावी किंवा फेसबुक पेज  पोस्ट करावे  असा विचार येताच , प्रवेश देताना तो फक्त  अणि फक्त जाड़ीवरच   अवलंबून असल्यामुळे हे माझे अखिल भारतीय स्वप्न सत्यात उतरलेले नाही।
( टीप  :पुण्यात प्रत्येक चळवळ ही अखिल भारतीय & प्रत्येक गोष्ट ही जगात भारी असते )

खाल्लेले अंगाला लावून घ्यायला पण भाग्य लागते। भरपूर चापून खाऊन देखील कृश राहिलेले अभागी  थोड़े (?)खाऊन पण मोकळेपणाने अंगावर खेळविणाऱ्या माझ्यासारख्याला लठ्ठ म्हणतात त्यावेळी भूतदयेखेरिज कुठल्याही नजरेने मी त्यांना  पाहू शकत नाही। 

हा माझ्यामते लहानपणापासूनच्या अन्नसंस्काराचा भाग असावा । खाणे  हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे कारण त्याबरोबर जीवनातील अत्यंत सुंदर आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत। बन मस्का , वडा पाव , दाबेली , भेळ , पटिस  असले अरबट-चरबट  पदार्थच आवडण्याच्या  काळात " सोकावली आहेत कार्टी,नुसते बाहेरचे खायला पाहिजे, ख़बरदार सारखे बाहेर खाल तर  " असा दम भरला जायचा। त्यावेळेला आमची आजी तिचे वय विसरुन आम्हा मुलांच्या चावटपणात सामिल व्हायची। आमचा आणि आजीचा करार असायचा मग आजी हळूच  दर रविवारी  बाबा कामाला गेले की आम्हाला वर्दी द्यायची व दुसऱ्या क्षणी  " खमंग गरमागरम पटिस अणि बनपाव घेऊन यायला आम्ही मार्केटमध्ये धूम ठोकलेली असायची। परत आल्यावर गरमागरम चहा , मऊ लुसलुशित बनपाव  आणि  खमंग  पटिस" असा जंगी बेत असायचा।  चहा आणि बनपाव ही जोडीच अशी आहे की खुप वर्षे नुसता पाव पण आपण खाऊ शकतो यावर माझा विश्वासच बसायचा नाही।  माझी आजी  मूळची नागपूरची असल्यामुळे क्षुधातृप्तीनंतर  "वा मज़ा आला " ही तिची प्रतिक्रिया म्हणजे आनंदाची परमावधी असायची।  पुढे थोड़े मोठ्ठे झाल्यावर या आमच्या खवय्येगिरिच्या ( किंवा खादाडीच्या  ) प्रवासातील आमचे सहप्रवासी होते माझे बाबा आणि नंतर मामा। कुठलेही नविन हॉटेल निघाले की  आमची स्वारी पहिल्या एक-दोन आठवड्यामध्ये तिथे पोचलेली असायची।  त्याकाळात जर " Hotel rating Apps" असते तर पॉकेटमनीला पुरेल इतके पैसे तर या व्यापातून  नक्कीच जमा झाले असते।  पुढे शिक्षणासाठी / नोकरीसाठी  मुंबईला किंवा पुण्याला असताना   'खिड़की वडा/ जोशी वडा', 'अप्पाची खिचड़ी', 'काटाकिर मिसळ', 'संतोष बेकरीचे  पटिस', 'कयानी बेकरीचा मावा केक' , शनिवारवाडयाच्या बाहेरच्या गाडीवरील डोसा , लोणावळ्याचा   " कामत  बटाटा वडा " किंवा 'कूपर फ़ज ', मद्रास कैफेचा ' मसाला डोसा , पाइनएप्पल शिरा ',ताड़देवची सरदार पावभाजी,पार्लेश्वर वडा पाव   ही म्हणजे आमच्या साठी खाद्य-तीर्थक्षेत्रेच  ! त्यात उत्साही असा माझा मामा म्हणजे आम्हा खवय्यांचा म्होरक्या।  एकदातर नवीन झालेला एक्सप्रेसवे दाखविणाच्या  निमित्ताने त्याने आम्हाला जुन्या गोवा हाईवे  जवळच्या   "दत्त  स्नैक्स " या टपरीतील "साबूदाणा  खिचड़ी अणि खरवस " खाऊ  घातले।  जीभेवर विरघळणाऱ्या त्या खरवसाची चव  अजूनही ताजी आहे।  आज त्याच दत्तचे खालापुर टोलप्लाज़ा जवळ मोठे होटेल आहे।  

सांगायचा मुद्दा असा की ही  आवड , कळकळ , उदरभरणातला  आनंद   डॉ दीक्षित किंवा  ऋतुजा दिवेकर (  साइज जीरो फेम करीना कपूरची आहार सल्लागार)  यांच्या डाइट प्लान च्या मागे झपाटलेल्या फिटनेस  प्रेमी  लोकांना  कोण समजावणार ! सध्या सेल्फी , इंस्टाग्राम फोटो च्या जमान्यात " फिगर " ला आलेले अवास्तव महत्त्व दूसरे काय।  

आता डॉक्टर लोकांचे विचाराल तर  त्यांचे पोट दुसऱ्यांनी खाल्लेल्या गोळ्यांनी भरत असल्याने  आपण किती पोळ्या खाव्यात किंवा खाऊ नयेत यावर सल्ला द्यायला ही मंडळी मोकळी  असतात। कारण  पोळी ऐवजी गोळी खपविण्यात त्यांचा फायदा आहे।  असो। 

माझे सोडा , पण  भारतीय  परंपरा , संस्कृति , सणवार  हे जर आपण तपासून पाहिले तर ती  एक मोठी अन्न चळवळच  आहे।   उत्सवात असणाऱ्या जेवणावळी , पंगती असोत किंवा आपले सण-समारंभ असोत , खाद्य  हे त्या प्रक्रियेचा महत्वाचा घटक आहे।  तिळाची वडी किंवा तीळगूळ असल्यामुळेच संक्रांत न ओढवता ती साजरी करता येते।  होळीच्या सणातून पूरणपोळी बाजूला काढ़ा , बोम्ब मारायला ऊर्जा कुठून येणार।  गुढीपाडवा साजरा करताना श्रीखंड  गरजेचे असतेच  ना।  रामनवमीतुन सुंठवडा किंवा कृष्णजन्माष्टमीतुन  दहिपोहे / दहिलाह्या  , हनुमान जयंतितून " खड़ी साखर खोबरे " वगळा , माझा अंदाज आहे बहुतेक लोक स्वःतला नास्तिक घोषित करतील। एवढेच कशाला  गणपतीला  उकडीचे मोदक  किंवा सत्यनारायणला शिरा नसेल तर  ते देवालाही चुकल्यासारखे वाटेलच ना। कलियुगातला सत्यनारायण शिरा नाही म्हणून कोपायचा वैगरे ! दिवाळीतून फराळ काढला    किंवा कोजागिरी पौर्णिमेतून  मसाला दूध वगळा , आता सणात काही राम राहिला नाही अश्या प्रतिक्रियांचा पाऊस पडेल।  

माझ्या मते  समृद्ध राष्ट्र  या संकल्पनेमध्ये  खवय्यांना पण स्थान असणे गरजेचे आहे।  खाउन तृप्त झालेली माणसे किमान वायफळ बडबडीमध्ये वेळ वाया घालवत नाहीत।  "Productivity Index" मध्ये  या गोष्टीचा समावेश करण्यासाठी तज्ञांनी जरूर विचार करावा। " उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म। " म्हटले आहे ते काय उगीच नव्हे। जठराग्निला भरपूर आहुत्या पडल्या पाहिजेत।  हे "चित्त विशाल होण्यासाठीचे " पुण्यकर्म आहे। 
आजकाल " intolerance debate" खूप जोरात आहेत ,  उदरभरणाकडे  केलेले दुर्लक्ष तर त्याच्या मागे नाही ना हे तपासले पाहिजे। 

शेवटी काय "या जन्मावर या जगण्यावर ,शतदा प्रेम करावे ", यातले जगणे हे खाण्याशी निगडित असल्यामुळे , खात रहा , खिलवत रहा। 

सर्व खवय्यांना जागतिक "वडा पाव " दिनाच्या शुभेछा ! 


  प्रमुख  वक्ते : डॉ अजित वामन आपटे  शिक्षण :   B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक ...