अब की बार ......
सध्या भारतभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे। ९० कोटी मतदाता , १० लाख मतदानकेंद्रे , ७ टप्प्यांमध्ये होणारे मतदान , ८०४९ उमेदवार अशा माहितीवरून याला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव का म्हणतात ते आपोआपच कळेल। आज (दि १९ रोजी ) शेवटच्या टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर या उत्सवाची उत्तरपुजा चालू होऊन दि २३ मे रोजी निकालानंतर सत्तारूपी प्रसाद वाटपाने याची सांगता होईल।
मला मुळातच हे सर्व प्राचीन भारतीय परंपरेनुसार एक यज्ञ कर्मच वाटत आलेले आहे। यज्ञा मध्ये जसे यजमान असतो जो आपल्या उद्दिष्टाच्या पुर्ततेसाठी / इच्छापूर्तीसाठी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सव्यापसव्य हाती घेतो। देव-देवतांना आवाहन करून , त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून " तथास्तु " असा आशीर्वाद मिळवून आपली इच्छा , मनोकामना पूर्ण करून घेतो .
आपले राजकीय पक्ष या यजमानसारखे आहेत। देव-देवतारूपी मतदारांना " आवाहन(स्वाहा :) " करून " मतदान आयोगाच्या (पुरोहित) अधिपत्याखाली , त्यांना वश करण्यासाठी हा निवडणूक रूपी यज्ञ आयोजिला आहे। मतदाराने तथास्तु म्हणुन मत (आशीर्वाद ) देऊन राज्य करण्याची (इच्छापूर्ति/ प्रसाद ) संधि द्यावी या साठी खुप प्रयत्नशील आहेत। यज्ञामधील आहुति म्हणजे हे यज्ञकर्म यशस्वी व्हावे यासाठी दिली जाणारी आश्वासने , केलेल्या कामांविषयी केले जाणारे दावे -प्रतिदावे , एकमेकांची उडविलेली खिल्ली।
ही आहुती
- कधी " कामदार vs नामदार " किंवा "चौकीदार चोर है vs मैं भी चौकीदार" अशा घोषणामय जल्लोषातच अडकलेली दिसते।
- कधी ती " गरजू , गरीब , दुर्बल समाजघटकांना दिल्या गेलेल्या योजनांच्या ( आयुषमान भारत , उज्जवला योजना , इज्जतघर (शौचालय )योजना , आवास योजना, शेतकरी कर्जमाफी vs न्याय योजना , रोजगार निर्मिति योजना , रयतबंधु योजना ) उहापोह करण्यात समरस झालेली असते
- कधी ती "राष्ट्रीय सुरक्षा , जागतिक व्यापार विस्तार , परराष्ट्रीय धोरणे, देशाची जागतिक प्रतिमा " Vs " नागरी अणि ग्रामीण समस्या & त्यातील तफावत " असे विशाल अणि अतिसूक्ष्म विषय एकाचवेळी हाताळत असते।
- कधी ती "भाषिक , धार्मिक अस्मितांना "आवाहन करत असते तर कधी ती "स्थानिक मुद्द्यांसमोर"(पाणी , दुष्काळ , स्रियांचे सबलीकरण , त्यांची सुरक्षा ) नतमस्तक होते।
- कधी ती "सबका साथ सबका विकास" म्हणतअसतानाच "जातीय अणि धार्मिक समीकरणे जुळवून " जास्तीतजास्त आपल्या देवतांनी तथास्तु म्हणावे म्हणून "ध्रुवीकरण "अस्त्राचा प्रयोग करते तर दुसरीकडे असे करताना "लाज कशी वाटत नाही " म्हणुन बोल लावताना पण दिसते ।
या सर्व यज्ञकर्मातून आहुति समर्पित केल्यावर देवतेला आवाहन ज्या मंत्रपठणातून होते ते म्हणजे " प्रचारसभा , मुलाखती , पदयात्रा , रोड शोज इत्यादी।
मतदार रूपी देवता जरी शहाणा असला किंवा सुबुद्ध असला तरी यजमान पण तितकेच हुशार अणि चतुर आहेत त्यामुळेच मग "साबरमतीच्या किनाऱ्यावरील यजमानाला " उत्तरेतील "माँ गंगा यज्ञासाठी बुलावा देते " किंवा "दुर्गाप्रदेशमध्ये रामभक्त अखंड यज्ञ आरंभतात , व रीतिप्रमाणे आहुति ही रक्तरंजित ठरते "
या सर्व मंथनातुन जी मूलभूत गरज प्रकट होते ती म्हणजे या सर्वांचा उद्देश। "अवघेचि संसार सुखाचा करीन " ही आपुलकीची भावना। या भावनेतून आचार विचार , भाषा , धर्म , राजनैतिक जाणिवा अश्या प्रवृत्तीचे दुवे जोडले जातात ज्यातून काही बंधने स्वखुशीने स्वीकारून राष्ट्र नावाची गोष्ट आकार घेते। राष्ट्रीय अस्मिता निर्माण होते। आपल्या जगण्याला विशेष अर्थ आहे हे दाखविणारे सांस्कृतिक विकासाचे टप्पे गाठते। साहित्य , कला निर्मिति होते , ज्यातून जगण्याच्या प्रेरणेची माहिती मिळते।या प्रेरणेचे , अस्मितेचे भांडवल केले जाते मग " राष्ट्रवादी vs अभिजन " किंवा " अखंड राष्ट्र Vs टुकड़े टुकड़े गैंग ", " स्थानिक vs उपरे " असे नवीन आवाहन केले जाते।
त्यामुळे हा "जनहितपूजन " विधी आहे , जो सौंदर्याने नटलेला आहे , ज्यात रस(Issues) ,रूप (Glamour), नाद( Clamour) , गंध(Emotions) या सगळ्या घटकांना स्थान आहे। ज्याची परिणीति " निर्मिति अणि विध्वंस " या त्रिकालाबाधित सत्यापाशी आपल्याला घेऊन जाते।
मतदार रूपी देवतेच्या आशीर्वादने या निवडणूक रूपी यज्ञामध्ये एखाद्या यजमानची "इच्छापूर्ति होते ", त्याला सत्तारूपी प्रसाद मिळताे ती नवनिर्मितीची सुरवात असते कारण ती हरणाऱ्या यजमानाच्या इच्छापूर्तिच्या विध्वंसा वर आकाराला येते।
इथे मला मराठी माणसाच्या राजकारणानंतरच्या दुसऱ्या आवडीच्या विषयातील सन्दर्भ आठविला , तो म्हणजे " नाटक अणि त्याची सुरवात ". आपल्याकडे असुर वृत्तीचा विध्वंस करणारा अणि नाट्य कलेचा ज्ञाता म्हणुन " शंकराची " पूजा करण्याची प्रथा आहे। " तुम्हा तो शंकर सुखकर हो " असे म्हटले की पड़दा वर जातो अणि नाटकाला सुरवात होते। असुर सुर बिघडवतात म्हणुन त्यांचे निर्दालन करायला " शंकराला " आवाहन केले जाते। पूर्वी संगीत नाटक सुरु होण्यापूर्वी "पंचतुंडनररुंडमाळधर पार्वतीश आम्ही नमितो " या नान्दीने नाटकाची सुरवात केलि जायची जेने करून नाटकाचा सूर चांगला लागावा।
कदाचित यातूनच प्रेरणा घेऊन काही यजमान निवडणूक रूपी रंगमचावर आपला अविष्कार चांगला रहावा म्हणून शंकर चरणी लीन झाले आहेत। सत्तारूपी प्रसाद मिळविताना आपला सुर बेसुर होउ नये म्हणुन शंकराला आवाहन करत आहेत।
त्यामुळे "निर्मिति अणि विध्वंस " या त्रिकालाबाधित सत्याच्या प्रयोगासाठी २३ मे ला तयार रहा
क्यों की
" अब की बार.. ......
भोलेनाथ बाबा की इच्छा के साथ "